पालखी
पेलता आली मला ना स्पंदनांची पालखी
घेतली गालावरी मी आसवांची पालखी
जाणले ना मी कधीही जायचे आहे कुठे
चालली आहे कुठे ही तारकांची पालखी
पेलता आली मला ना स्पंदनांची पालखी
घेतली गालावरी मी आसवांची पालखी
जाणले ना मी कधीही जायचे आहे कुठे
चालली आहे कुठे ही तारकांची पालखी
अक्षरांच्या घोळक्याला चाल का लाभू नये?
हाय माझ्या जीवनाला ताल का लाभू नये?
वार यांचे वार त्यांचे झेलतो छातीवरी
वार रोखायास साधी ढाल का लाभू नये?
हासरा जो काल होता आज चिंताग्रस्त आहे
चेहरा पाहून माझा आरसाही त्रस्त आहे
झेलण्या तूफान सारे काल होतो एकटा मी
आज माझ्या सोबतीला आसवांची गस्त आहे
पोळलो आगीत ज्या, झेलू नको तो जाळ तू
ज्या चुका मी काल केल्या त्या चुकांना टाळ तू
देत आहे मी तुला माझीच ही कादंबरी
ह्या चुकांच्या पुस्तकाची रोज पाने चाळ तू
पेटली जी काल होती आज का ती थंड ज्वाला?
सूर ओठांतील राणि का असा निस्तेज झाला?
बेगड्या त्या मौत्तिकांचा हट्ट दे सोडून आता
ओवुनी मी आसवांना गुंफली ही मुग्ध माला
तुझी ती तान आता याद येते
अदा बेभान आता याद येते
तुला पाहून होते संपले जे
हरवले भान आता याद येते
स्पर्शता तू आज मी बेभान झालो
आसमंती दाटले तूफान झालो
या तुझ्या ओठांस राणी स्पर्शण्या
मी पहाटे छेडलेली तान झालो
जी तुझ्या पासुन नाही वेगळी
सावली गोर्या तनाची सावळी
काय मी देउ तुला आता सखे
अर्पितो माझ्या जिवाची पाकळी
नाही कुणीच माझ्या सत्यास जाणणारे
आहेत सर्व येथे खोटेच कुंथणारे
ते लोक कोण जाणे मज भेटतील केंव्हा
श्वासांत मोगर्याच्या गंधास गुंफणारे
प्रत्येक रात्र येते घेउन याद राणी
गेली किती युगे मी देतोय साद राणी
पेटून थांबलाहे ॐकार स्पर्श माझा
ऐकू तुला न येई हा ब्रम्हनाद राणी
©2000-2018 Prasad Shirgaonkar, All rights reserved.